ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- ज्ञानकर्मसंन्यासयोग-अध्याय चौथा


ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य- ज्ञानकर्मसंन्यास योग- अध्याय चौथा

अर्जुनाचे अलौकिक भाग्य
चौथ्या अध्यायाच्या सुरुवातीसच श्री ज्ञानदेवांनी अर्जुनाच्या अलौकिक भाग्याची स्थिती वर्णिली आहे. जो विवेकविचार भगवंत अर्जुनाला सांगत आहेत तो नुसता ऐकणे म्हणजे श्रवणेंद्रियांची पहाट होणे, स्वप्न सत्यात अनुभवणे.बोलणारा श्रीकृष्ण व ऐकणारा अर्जुन आणि विषय असा गहन.
ज्ञानेश्वर म्हणतात- हे संवादसुख भोगण्यासाठी साऱ्या इंद्रियांच्या शक्ती श्रवणेंद्रियात एकवटून येतात, मग प्रत्यक्ष ज्याच्यासाठी हा संवादयोग जुळून आला तो अजून किती भाग्यवान! या दैवी गुणांनी युक्त अशा सुहृदासाठी श्री नारायणाच्या मनात काही वेगळेच प्रेम विलसत आहे. जे पिता वासुदेव, माता देवकी किंवा बंधू बळिराम यापैकी कुणालाही श्रीभगवंतांनी सांगितले नाही ते आज अर्जुनाच्या श्रवणी पडत आहे. जिचे सतत सान्निध्य त्या देवी लक्ष्मीलाही हे गुह्य भगवंतांनी कधी सांगितले नाही. 
देवी लक्ष्मीयेवढी जवळिक ।परी तेही न देखे या प्रेमाचें सुख|
आजि कृष्णस्नेहाचें बिक । यातेंचि आथी ॥९॥
देवी लक्ष्मी एवढी जवळ असणारी पण या प्रेमाचे सुख तिलाही कधी दिसले नाही. कृष्णाच्या प्रेमाचे फळ यालाच आज लाभत आहे ॥९॥
चौथ्या अध्यायातील या नवव्या ओवीत श्रीज्ञानेश्वर म्हणतात, "देवी लक्ष्मी ही श्रीनारायणाची अर्धांगिनी ,त्याचे निकटतम सान्निध्य तिच्या हक्काचे, पण या प्रेमाचे सुख तिनेही भोगलेले नाही."
सनकादिकांच्या आशा खूप बळावल्या खऱ्या पण इतके यश त्यांनाही मिळाले नाही .श्रीज्ञानदेव म्हणतात," हा अर्जुन कोणत्या पुण्यप्रभावामुळे या अधिकारास आला कोण जाणे, पण या सर्वेश्वराचे प्रेम त्याने सर्वस्वी जिंकलेले आहे. त्याच्यासाठीच  हा निर्गुणातून सगुणात आला. एरवी हा योग्यांना दुर्लभ ,वेदार्थासही अगम्य . ध्यानाचीही नजर त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. त्रैलोक्यरूप वस्त्राची घडी, आकाराचे पैलतीर असा हा स्वामी. हा अर्जुनाला मात्र वश आहे." अशा शब्दात अर्जुन व श्रीकृष्णाच्या नात्याचे एकमेवपण जे अर्जुनाचे अहोभाग्य आहे ,ते श्री ज्ञानदेवांनी वर्णिले आहे. 

कर्मयोगाचा इतिहास-
मग देव म्हणे अगा पंडुसुता| हाचि योगु आम्हीं विवस्वता ।
कथिला परी ते वार्ता । बहुतां दिवसांची ॥१६॥
मग देव म्हणाला. अरे अर्जुना, हाच निष्काम-कर्मयोग आम्ही सूर्याला सांगितला,परंतु ती गोष्ट फार दिवसांची आहे.

श्रीकृष्णाने आदिकालापासूनचा कर्मयोगाचा इतिहास अर्जुनास कथन केला. ते म्हणतात फार दिवसांपूर्वी हा योग आम्ही विवस्वतास सांगितला आहे. ही योगस्थिती तदनंतर विवस्वत सूर्याने मनूला सांगितली.मनूने तिचा अनुभव घेऊन इश्वाकूला तिचा उपदेश केला, अशी ही परंपरा विस्तारली आहे. त्याहीनंतर कित्येक राजर्षींना हा योग माहिती झाला पण नंतर मात्र सांप्रत काळात ही परंपरा खंडित झाली.कामासक्त व देहाधीन अशा प्राणिमात्रांना आत्मबोधाचा हळुहळू विसर पडला. आत्मबोधाची सनातन योगस्थिती ही अनादिसिद्ध आहे आहे पण कामवासनेवर भर देणाऱ्या, देहाचा आदर करणाऱ्या प्राण्यांना आत्मशोधाचा विसर पडला आहे असा भाव चौथ्या अध्यायातील विसाव्या ओवीत भगवंताने व्यक्त केला आहे .
जे प्राणियां कामीं भरु । देहाचिवरी आदरु ।
म्हणौनि पडिला विसरु । आत्मबोधाचा ॥२०॥
आस्था बुद्धी आडमार्गाने गेल्यामुळे विषयसुख हेच लोकांना परमसुख वाटू लागले. नग्नांच्या गावी वस्त्रे काय कामाची? जन्मांधाला सूर्याचे काय? बहि-यांच्या सभेत गाणे कशाला? चोरांना व कावळ्यांना चांदणे कसे आवडणार !अशा तऱ्हेने वैराग्य विवेकाचे नावही माहिती नसणारे हे मूर्ख  ईश्वराला कसे भजणार? अशा स्थितीमध्ये या परंपराप्राप्त योगाचा लोप होणे क्रमप्राप्त.

अर्जुनाची आशंका आणि श्रीकृष्णांनी केलेले शंकानिरसन-

तूं संसारश्रांतांची साउली । अनाथ जीवांची माउली ।

आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ॥३३॥
देवा पांगुळ एकादें विजे । तरी जन्मौनि जोजारु साहिजे ।
हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥३४॥
श्रीज्ञानदेव म्हणतात, तेव्हा अर्जुनाने श्रीहरीला विचारले ,"माता आपल्या लेकरांवर प्रेम करते याचे आश्चर्य ते काय म्हणायचे! हे कृपासिंधु, तू संसारतापाने पोळलेल्यांची सावली ,अनाथांची माय .तुझ्या कृपेनेच आमचा जन्म झाला. एखाद्याच्या पोटी अपंग मूल जन्माला आले तर त्याला त्याचा भार जन्मभर वहावा लागतो हे तुला काय सांगावे?
म्हणून मी जे विचारतो ते न रागावता चित्त देऊन ऐक. तू हा जो इतिहास म्हणून सांगितला आहेस, तो माझ्या मनाला काही पटत नाही.या विवस्वताचे नाव तू घेतलेस, तो कुठल्या काळातला हे वाडवडिलांनाही ठाऊक नाही.मग तू त्याला कधी उपदेश केलास?आम्ही असे ऐकतो की तो फार पूर्वीच्या काळातला. कृष्णा तू तर सांप्रत काळातला. तुझ्या भाषणात हा विसंवाद कसा? तू बोलतोस ते खोटं तरी कसे म्हणावे? तुझे चरित्र तर कळत नाही म्हणून देवा या उपदेशाची गोष्ट मला सोपी करून सांगावी. 

अर्जुनाने श्रीकृष्णाच्या शब्दांवर आश्चर्य व काहीसा अविश्वास प्रकट केलेला पाहून श्रीकृष्णांनी आपल्या अवताराचे स्वरूप त्याला समजावून सांगितले श्रीकृष्ण म्हणाले," हे पांडवा, हा सूर्य विवस्वत जेव्हा होता तेव्हा आम्ही नव्हतो असा तुला भ्रम झालेला आहे. अरे असे तुझे व माझे कित्येक जन्म होऊन गेले, तुला ते सर्व स्मरत नसले तरी माझे सर्व अवतार मला नीट आठवतात. जन्मरहित असा मी प्रकृतीच्या प्रभावाने जन्म घेतो, पण या जन्मांमुळे माझे अविनाशीत्व भंगत नाही,किंवा माझ्या स्वातंत्र्यालाही बाधा येत नाही. भ्रांत बुद्धीला मात्र अवतारकालात मी कर्माधीन असल्याचे जाणवते. एकच वस्तू प्रतिबिंबांच्या योगाने अनेक भासते, तसेच मूलतः निराकार असा मी प्रकृतीच्या ठायी अनेक रूपांनी नटतो, त्या मी युगायुगांमधून धर्माचे रक्षण करावे असा अनादि काळापासूनचा संकेत आहे, म्हणून जेव्हा अधर्म हा धर्मावर मात करू पाहतो तेव्हा माझे अजन्मत्व बाजूला ठेवून मी जन्म घेतो,आणि अज्ञानाचा अंधकार नाहीसा करतो.
जें धर्मजात आघवें । युगायुगीं म्यां रक्षावें ।
ऐसा ओघु हा स्वभावें । आद्यु असे ॥४९॥
"यदा यदाहि धर्मस्य " या सुपरिचित श्लोकाचा तत्त्वार्थ चौथ्या अध्यायाच्या ४९व्या ओवीत श्रीज्ञानेश्वरांनी मांडला आहे. जितके म्हणून सर्व धर्म आहेत ते युगानुयुगे मी रक्षण करावे असा हा महाप्रवाह अनादिकाळापासून सहज चालत आलेला आहे असे नि:संशय आश्वासक विधान येथे श्रीभगवंतांनी केलेले आहे. 
अधर्माची अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवीं गुढी । सुखाची उभवीं ॥५२||
ज्ञानेश्वरीच्या चतुर्थ अध्यायातील ही बावन्नावी ओवी. श्रीभगवंत जेव्हा अवतार घेतात तेव्हा ते अधर्माची कालमर्यादा म्हणजे अवधी तोडून टाकतात ,दोषांचे लेख फाडून टाकतात व सज्जनांकरवी सुखाची गुढी उभारतात,असे आश्वासन स्वयम् त्यांनीच दिलेले आहे. "परित्राणाय साधुनां" या शब्दांचा भावार्थ सांगणारी ही ओवी जणू ईश्वराच्या प्रेमाने , त्याच्या सामर्थ्याच्या जाणिवेने धुंद झाली आहे. तिच्यामध्ये एक अलौकिक आवेश आहे.
निर्गुण असा भगवंत पापक्षालनार्थ आणि धर्मपालनार्थ जेव्हा अवतार घेतो तेव्हा  भक्तांच्या आनंदाला पारावार राहत नाही. अवताराच्या नुसत्या निरुपणाने श्री ज्ञानदेवांचे शब्द येथे आनंदाने थुईथुई नाचत आहेत.यानंतरच्या ओव्या याच भावार्थाचा  विस्तार करतात. 
"- मी अवतार घेऊन अधर्माचे आयुष्य संपवतो ,दोषांचे आलेख काढून टाकतो .सज्जनांकरवी सुखाची गुढी उभवतो. दैत्यांचा नाश करून साधूंना त्यांची प्रतिष्ठा प्राप्त करून देतो .धर्माचे नीतीशी लग्न लावून देतो .अविवेकाची काजळी काढून मी विवेकाचे दीपप्रज्वलन करतो  तेव्हा योगिजनांना ती दिवाळीच वाटते .विश्व आत्मसुखाने कोंदाटून जाते.सर्वत्र धर्माचे अस्तित्व दिसते. भक्तजनांच्या सात्त्विकतेची जणू दोंदे निघतात. पापाचा पहाड फोडून पुण्याचा उषःकाल होतो. या सर्व कार्यासाठी युगायुगांमध्ये मी प्रकट होतो, हे ज्याला कळते तोच खरा विवेकी."
अशा शब्दांत आपल्या अनादि-अनंत व्याप्तीची व त्यातच उमटून जाणाऱ्या अवतार-रूपांची ओळख श्रीकृष्णाने अर्जुनाला करून दिली व एक सुहृद म्हणून अर्जुनाचा श्रीकृष्णांकडे पाहण्याचा  जो मर्यादित  दृष्टिकोन आहे त्यापलिकडे त्याला नेले. 

कर्म-अकर्म विवेक-
गीतेत चौथ्या अध्यायाच्या सतराव्या श्लोकात भगवंतांनी "गहना कर्मणो गति:" असे म्हटले आहे . म्हणजे कर्माची गती गहन आहे .कर्माच्या अत्यंत गहन स्वरूपाबद्दल मनुष्यमात्रांच्या मनातील भ्रम त्यांनी येथे सुस्पष्ट केला आहे.त्या भ्रमाच्या निवारणार्थ खरेखुरे ज्ञानच पाहिजे. आपापल्या मनाप्रमाणे या दुखण्यावर इलाज करता येत नाही. श्रीज्ञानदेव याचे विवेचन करताना म्हणतात, या सृष्टीत कर्माशिवाय देणारे घेणारे काहीच नाही!
वांचून देतें घेतें आणिक । निभ्रांत नाहीं सम्यक ।
एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥७३॥
श्रीभगवंत म्हणतात,"मनुष्यमात्र मनात हेतू ठेवून जे यथोचित उपचार उपासना करतात ,त्यास मी फक्त साक्षीभूत असतो. फळते ती त्यांची भावनाच .कर्माचे महत्त्व एवढे असल्याने कर्म व अकर्म म्हणजे काय याबद्दल ज्ञानी लोकांतही वैचारिक गोंधळ असतो.खोटे नाणे खऱ्या नाण्यांपासून वेगळे ओळखणे डोळ्यांना कठीण ,तसाच हा कर्माकर्म विवेक भल्याभल्यांना गुरफटवून टाकतो. विश्वाच्या व्यवहारास कारणीभूत ते कर्म, वर्णाश्रमानुसार उचित असे विहितकर्म ते विकर्म ,आणि निषिद्ध ते अकर्म हे समजून घेतल्यावर हा गुंता सुटतो. जो कर्मामध्ये अकर्म पाहतो व अकर्मात कर्म पाहतो तोच खरा ज्ञानी ." हे विवेचन सुंदर उपमांच्या सहाय्याने श्रीज्ञानदेवांनी स्पष्ट केले आहे .ते म्हणतात," जळात प्रतिबिंब पाहणाऱ्याला आपण म्हणजे प्रतिबिंब नव्हे हे कळते .नावेतून जाणाऱ्याला किनाऱ्याचे वृक्ष मागे जाताना दिसतात पण वृक्ष स्थिर आहेत हे तो जाणतो. उदयास्त निमित्ताने सूर्य चालताना दिसतो पण वस्तुस्थिती तशी नसते. तद्वत, ज्ञानी कर्मामध्ये राहूनही व ती अत्यंत आदरेखून करतानाही त्यांपासून व विशेषतः फलाशेपासून स्वतःला अलिप्त ठेवतो, हे कर्मात अकर्म पहाणे होय.अशा ज्ञानी व्यक्तीच्या नैष्कर्म्यतेतही त्याचे प्राप्त कर्माचरण चुकत नाही.
जयांचें ऐहिक धड नाहीं । तयांचे परत्र पुससी काई ।
म्हणौनि असो हे गोठी पाहीं । पंडुकुमरा ॥१५५॥
ही चौथ्या अध्यायातील १५५वी ओवी. श्री ज्ञानेश्वर म्हणतात ज्यांचे ऐहिक  जीवन धड नाही त्यांची परलोकातील अवस्था काय सांगावी? मानवजन्माला येऊनही ज्यांनी योगस्थितीचा अभ्यास केला नाही ,विरक्तीची प्राप्ती केली नाही,अशांबद्दल हे विधान आहे.
अशा रीतीने भगवंतांनी उच्चारलेले कर्मविषयक सिद्धांत श्री ज्ञानदेवांनी सामान्यांच्या आकलनकक्षेत येण्याइतपत सुगम केले आहेत.त्यांची गहनता सुलभ केली आहे. 

निरनिराळ्या यज्ञांचे स्वरूप-
चौथ्या अध्यायात यानंतर अनेक प्रकारचे यज्ञ बारकाईने वर्णिलेले आहेत.
सर्वप्रथम मनासहित अविद्येचेच  गुरुवाक्यरूप अग्नीत हवन करणारे असे लोक दैवयज्ञ करतात. या यज्ञात इच्छा असते ती फक्त आत्मसुखाची. देहधारण मात्र सर्वस्वी दैवावर सोडलेले असते.
जे याज्ञिक ब्रह्मरूप अग्नी पूजतात ते ब्रह्मरूप द्रव्यानेच या यज्ञाची उपासना करतात. संयमाग्निचे अग्निहोत्री युक्तीत्रय मंत्राने शुद्ध झालेल्या इंद्रियद्रव्याचे यजन करतात.
कुणी इंद्रियनिग्रहाच्या अग्निकुंडात इंद्रियाग्नि चेतवून विरक्तीची ज्वाळा प्रज्वलित करतात.तेथे विकाररूप इंधन जाळून आशेचा धूर नाहीसा करतात.मग गुरुवाक्याच्या कुशलतेने भरपूर विषयांच्या आहुती देतात. या हवन प्रक्रियेत राहिलेले शेष तोच आत्मबोधरूप पुरोडाश.
कुणी द्रव्ययज्ञ करतात आणि तपाने यज्ञसामग्री निर्माण करतात कोणी पूर्वी सांगितल्याप्रमाणे योगयज्ञ करतात.
कुणी शब्दांमध्ये शब्दाचा यज्ञ करतात त्याला वाग्यज्ञ म्हणतात.ज्ञानाने ज्ञेयवस्तू जाणून घेणे हा ज्ञानयज्ञ. 
हे विविध प्रकारचे गहन  यज्ञ जितेंद्रियांकडून त्यांच्या योग्यतेमुळे आचरले जातात. 

ज्ञानाचा महिमा-
अनेकानेक यज्ञांची महती सांगून श्री भगवंत पुढे म्हणतात,"या सर्वांच्या आचरणाने स्वर्गसुख अवश्य मिळते. वेदांमधून मूलत: उत्पन्न झालेले व कर्मसिद्ध असे हे बहुशः द्रव्यादियाग यज्ञरूपच आहेत पण हे अर्जुना, ज्ञानयज्ञाची सर त्यापैकी कुणालाच नाही." 
श्री ज्ञानदेव यावर भाष्य करतात - "तारकांचे तेजोधन सूर्यापुढे ज्याप्रमाणे निस्तेज ठरते तसेच हे द्रव्यादियाग ज्ञानयज्ञाच्या तुलनेत निष्प्रभ ठरतात. याचे परमसुखनिधान प्राप्त करून घेण्यास योगीजन ज्ञानचक्षुंमध्ये अंजन घालून सावध राहतात. कर्माची धाव इथे संपते, तर्काची दृष्टी मालवते.ते ज्ञान म्हणजे नैष्कर्म्यबोधाची खाणच असून साधने करण्याची क्षुधाच इथे संपते. प्रवृत्ती इथे पांगळी होते,मनाचे मनपण विरते. इंद्रियांचा विषयसंग सुटतो. बोलण्याचे बोल संपतात, कारण जे जाणावयाचे असते ते सापडलेले असते. वैराग्याचे पांग फिटून विवेकाचीही इच्छा लोप पावते कारण आत्मरूपाची भेट झालेली असते. 
जे लोक असे यज्ञ करून, त्यासाठी कठोर साधनेचा अवलंब करून ब्रह्मज्ञानमय अमर्त्य भावाप्रत पोहोचतात ते मनुष्यवेषधारी ब्रह्मच असतात. असे संत हे ज्ञानाचे घर आहे. सेवा हा तेथे उंबरठा आहे. तनमनाने त्यांच्या चरणी लीन व्हावे आणि अहंता सोडून त्यांचे दास्य करावे तेव्हा ते सर्व ज्ञानाचा उपदेश करतील. 
जरी कल्मषाचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु ।
व्यामोहाचा डोंगरु । होउनी अससी ॥१७२॥
तऱ्ही ज्ञानशक्तिचेनि पाडें । हें आघवेंचि गा थोकडें ।
ऐसें सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानीं इये ॥१७३॥
देखैं विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कडवसा ।
तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥१७४॥
श्रीज्ञानेश्वर आपल्या प्रतिभाश्रीमंत शब्दात सांगतात ,"असे जेव्हा होईल तेव्हा तू पापाचे आगर ,भ्रांतीचा सागर, व्यामोहाचा डोंगर जरी असलास तरी या ज्ञानशक्तीच्या प्रभावाने हे सर्व कस्पटासारखे उडून  जाईल. हा सारा विश्वभ्रम हाच अमूर्ताचा एक कवडसा,तो ज्ञानप्रकाशाची बरोबरी काय करेल!" 

संशयाचे स्वरूप आणि घोर परिणाम-
म्हणौनि संशयाहूनि थोर । आणिक नाहीं पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियांसि ॥२०३॥
संशयापेक्षा थोर असे दुसरे घोर पातक कोणतेच नाही. हा संशय प्राण्याला विनाशाचे एक जाळेच आहे. ॥२०३॥
येणें कारणें तुवां त्यजावा । आधीं हाचि एकु जिणावा ।
जो ज्ञानाचिया अभावा- । माजि असे ॥२०४॥
एवढ्याकरता तू याचा त्याग करावा. जेथे ज्ञानाचा अभाव असतो तेथेच जो असतो त्या ह्या एकट्यालाच पहिल्याने जिंकावे. ॥२०४॥
ज्ञानार्जनाच्या अभावात संशय फोफावतो. भगवंताच्या ज्ञानमय स्वरूपाबद्दलची अनास्था आणि विषयांचा संग माणसाला संशयाकडे घेऊन जातो, म्हणून श्री ज्ञानदेवांना संशय हेच घनघोर पाप वाटते. 

श्रीज्ञानदेवांचा स्वत:च्या मराठी अभिव्यक्तीबद्दलचा आत्मविश्वास -

तो शांतुचि अभिनवेल । ते परियसा मऱ्हाटे बोल ।
जे समुद्राहूनि सखोल । अर्थभरित ॥२१४॥
तो शांतरसच ज्यात अपूर्वतेने प्रगटेल, जे अर्थपूर्ण व समुद्रापेक्षाही गंभीर आहेत, ते  हे मराठी बोल ऐका. ॥२१४॥
जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें ।
शब्दाची व्याप्ति तेणें पाडें । अनुभवावी ॥२१५॥
सिद्ध अर्थ निरूपण करणारे आपले हे मराठा शब्दच  सूर्यबिंबासारखे महाप्रकाशमान प्रभावी आहेत ,त्यांच्या ज्ञानतेजाला त्रिलोक  तोकडे पडणार आहेत असा आत्मविश्वास ज्ञानेश्वर चौथ्या अध्यायाच्या शेवटी व्यक्त करतात. 

-भारती बिर्जे डिग्गीकर 


Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –