ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग


ज्ञानेश्वरी तत्त्वकाव्य परिचय -अध्याय नववा- राजविद्या राजगुह्ययोग

'राजविद्या राजगुह्ययोग' असे सुंदर नाव धारण करणारा भगवद्गीतेच्या ऐन मध्यावरील हा नववा अध्याय आहे.यात श्रीभगवंतांनी अध्यात्मविद्येला राजविद्या म्हटले आहे,म्हणजेच अध्यात्मविद्या ही सर्व विद्यांची सम्राज्ञी आहे . याहीपुढे जाऊन श्रीभगवंतांनी या अध्यायात अध्यात्मविद्येच्या साधकांसाठी काही विलक्षण गूढांची उकल केली आहे . हेच ते राजगुह्य म्हणजे सगळ्यात मोठे गूढ .श्रीभगवंतांचे हे क्रांतदर्शी विवेचन आणि त्यावरील श्रीज्ञानेश्वरांचे निरूपण यामुळे हा अध्याय गूढाच्या प्रवासातील दीपस्तंभासारखा मार्गदर्शक झाला आहे.

ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांविषयी व्यक्त केलेली आदरभावना

नवव्या अध्यायाच्या आरंभी ज्ञानेश्वरांनी आपल्या श्रोत्यांबद्दल आत्यंतिक आदराची भावना प्रकट केली आहे. त्यांनी या श्रोत्यांना 'सर्वज्ञांचा समाज' म्हणून गौरविले आहे. अशा उदारधि श्रोत्यांचा आश्रय असेल, तर लळे व मनोरथ पूर्ण होणारच, कारण हे श्रोते त्यांना श्रीमंत माहेरासारखे कृपाशील व वत्सल वाटतात.
कां जे लळेयांचे लळे सरती । मनोरथांचे मनोरथ पुरती ।
जरी माहेरें श्रीमंतें होती । तुम्हां ऐसीं ॥ ३ ॥
-कारण तुमच्यासारखे जर समर्थ आईबाप असतील तर हट्ट घेणारांचे लाड पुरतात व साक्षात् मनोरथांचेही मनोरथ प्राप्त होतात.
तुमचे या दिठिवेयाचिये वोलें । सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ।
ते साउली देखोनि लोळें । श्रांतु जी मी ॥ ४ ॥
-तुमच्या त्या कृपारूप दृष्टीच्या ओलाव्याने प्रसन्नतारूप मळा टवटवीत झाला. त्य़ाची ती सावली पाहून महाराज, तेथे मी श्रमलेला लोळत आहे..
त्या श्रोत्यांच्या दृष्टीतल्या ओलाव्यावर प्रसन्नतेचे मळे पोसलेले आहेत व ज्ञानदेव जणू श्रांतीच्या निराकरणार्थ तिथे सावलीत विसावले आहेत, असे एक मनोज्ञ कल्पनाचित्र त्यांनी रेखाटले आहे.
अशा श्रोत्यांची योग्यता साक्षात सरस्वतीपुत्रांसारखी. त्यांना कोणते पाठ शिकवावेत?त्यातून व वर्ण्यविषय अमृताच्या ताटासारखा.त्यात कोणती पाकसिद्धी वाढावी ?तरीही सूर्याला काडवातीने ओवाळावे, समुद्राला घोटभर पाण्याचे अर्घ्य द्यावे ,तसा ज्ञानेश्वरांनी आपला वाग्यज्ञ या श्रोत्यांसमोर आरंभला आहे .हे श्रोते म्हणजे जणू करूणाकर शंकराची मूर्ती. दुबळ्या जिवाने प्रेमाने अर्पिलेली निर्गुंडीही श्री शंकर सहर्ष स्वीकार करतात. बाळ वडिलांच्या ताटात जेवताना त्यांनाच भरवू लागते ,पण वडील संतोषभराने या क्रीडेत सहभागी होतात, तसाच हा प्रकार.
यत्सदृश अनेक उपमांची योजना करून ज्ञानेश्वरांनी पुढे या श्रोत्यांच्या अवधानरुपी अमृताची प्रशंसा केली आहे.
तरि आतां चंद्रापासोनि निववितें । जें अमृताहूनि जीववितें ।
तेणें अवधानें कीजो वाढतें । मनोरथां माझिया ॥ २४ ॥
तर आता चंद्रापेक्षाही शांत करणारे व अमृताहूनही जीवित वाढवणारे असे जे आपले अवधान, त्य़ा अवधानाने माझ्या मनोरथांची वाढ करावी.
कां जैं दिठिवा तुमचा वरुषे । तैं सकळार्थ सिद्धि मती पिके ।
एर्‍हवीं कोंभेला उन्मेषु सुके । जरी उदास तुम्ही ॥ २५ ॥
कारण की जेव्हा तुमच्या कृपादृष्टीचा वर्षाव होईल, तेव्हा माझ्या बुद्धीत सर्वार्थ पूर्णपणे स्फुरतील व एरवी जर तुम्ही उदास रहाल तर अंकुरदशेला आलेले माझे ज्ञान सुकेल.
या श्रोत्यांनी दिलेल्या अवधानाच्याच बळावर निरूपणकाराच्या अक्षरांना अर्थांची पुष्टता येते .अर्थ जणू उच्चाराची वाट पाहत उभा राहतो .अभिप्रायातून अभिप्राय निघू लागतो. बुद्धीवर भावनेचा सुंदर फुलोरा डोलू लागतो. संवादसुखाच्या या सुखकर झुळुका वाहू लागल्या की हृदयाकाशात ज्ञानमेघांची दाटी होते. 

येथे अजून एका सुंदर उपमेची योजना ज्ञानेश्वर करतात.

अहो चंद्रकांतु द्रवता कीर होये । परि ते हातवटी चंद्रीं कीं आहे ।
म्हणौनि वक्ता तो वक्ता नोहे । श्रोतेनिविण ॥ २९ ॥
अहो 
चंद्रकांत मणी पाझरतो हे श्रेय खरे तर चंद्राचे आहे. असेच सामर्थ्य या श्रोत्यांच्या स्नेहमय अवधानात आहे कारण .त्यांच्याशिवाय वक्ता हा वक्ताच नाही..

 'मला नाचव 'असे का बाहुली सूत्रधाराला सांगते? तेव्हा या श्रोत्यांच्याच इच्छेने हा निरूपणसोहळा चालला आहे असे ज्ञानदेवांनी परमविनयभावनेने सूचित केले आहे.


गूढ आत्मविद्येचा विस्मर पडण्याची कारणे

राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् ।
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥ २ ॥
हे ज्ञान सर्व विद्याचा राजा, सर्व गुह्यांचा स्वामी, पवित्र, उत्कृष्ट ,प्रत्यक्ष अनुभवास येणारे, धर्माला अनुसरून असलेले, सुखाने (अथवा सहज) आचरण करता (मिळवता) येणारे आणि क्षयरहित आहे. 
जे जाणणेया आघवेयांच्या गांवीं।गुरुत्वाची आचार्य पदवी ।
जें सकळ गुह्यांचा गोसावी । पवित्रां रावो ॥ ४७ ॥
जे स्वरूपज्ञान या सर्व विद्यांचे गावामधे श्रेष्ठत्वाच्या आचार्यपदावर आहे आणि जे ज्ञान सर्व गुप्त गोष्टींचा स्वामी आहे व जे पवित्र गोष्टींचा राजा आहे ..
-उत्तमोत्तम विद्यांच्या गावातील आचार्यपदवी मिळवणारे हे गुह्यतम पवित्रतम आत्मज्ञान सुखाची जणू सीमाच आहे. हे घटत नाही, भोक्ता याला विटत नाही, असे स्पष्ट करून पुढे श्रीभगवंतांनी अर्जुनाच्या वतीने अशी शंका उपस्थित केली आहे की क्षुल्लक गोष्टीच्या प्राप्तीकरता जीव धोक्यात घालणाऱ्यांच्या या जगात हे ज्ञान कसे लपून राहिले?
येथ जरी तूं तार्किका । ऐसी हन घेसी शंका ।
ना येवढी वस्तु हे लोकां । उरली केविं पां ? ॥ ५३ ॥
या ठिकाणी तर्ककुशल अर्जुना, तू जर अशी शंका घेशील की एवढी ज्ञानासारखी वस्तु अनुभव घेतल्याशिवाय लोकात कशी राहिली ?
जे एकोत्तरेयाचिया वाढी । जळतिये आगीं घालिती उडी ।
ते अनायासें स्वगोडी । सांडिती केवीं ? ॥ ५४ ॥
शंभराला एक रूपया व्याज मिळून त्याचे एकशेएक रुपये व्हावेत म्हणून जळत्या अग्नीमधे  उडी घालतात, असे जे स्वार्थी लोक, ते कष्टावाचून मिळणारी स्वरूपसुखाची गोडी कशी टाकतील ?
त्याचे परस्पर उत्तर देताना भगवंत म्हणतात, "जवळच असलेले दूध सोडून गोचीड रक्त का पिते? भ्रमराने पराग न्यावेत पण त्याच कमलपुष्पाच्या मुळाशी राहणारा बेडूक चिखलातच का रमतो ? हतभाग्याच्या घरात गुप्तधनाचे साठे असताना तो उपास का काढतो? तसेच अहंममतेच्या, कामभावनेच्या, विषयवासनेच्या आहारी गेलेल्या या लोकांना हृदयस्थ विश्रामरूप माझा विसर पडतो व भ्रांतीचा पाठलाग मात्र ते सातत्याने करतात. मृगजळ पाहून तोंडात आयते पडलेले अमृत थुंकून टाकावे, शिंपल्याच्या लाभासाठी गळ्यातला परीस तोडून द्यावा, तसे हे दुर्दैवी जीव आत्मज्ञानाला अंतरून बाह्यज्ञानामागे धापा टाकत पळतात. एरवी मी सूर्याप्रमाणे समोर स्पष्ट तळपणारा, पण यांच्या नजरेला येत नाही!"
येथे या भ्रांतीचे स्वरूप स्पष्ट होण्यासाठी ज्ञानेश्वरांनी अजून एका भव्य वैश्विक प्रतिमेची योजना केली आहे.

एर्‍हवीं संकल्पाचिये सांजवेळे|नावेक तिमिरेजती बुद्धीचे डोळे ।
म्हणौनि अखंडितचि परि झांवळे ।भूतभिन्न ऐसें देखे॥७२ ॥
सहज विचार केला तर कल्पनारूप संध्याकाळी बुद्धीची दृष्टी क्षणभर मंद होते, म्हणून माझे स्वरूप अखंड असले तरी ते अस्पष्ट होते व त्या ठिकाणी भूते निरनिराळी आहेत असे दिसते!
- संकल्पाची संध्याकाळ झाली की बुद्धीचे डोळे अंधारतात व अखंड असे सत्स्वरूप तिला भिन्नभिन्नत्वाने प्रतीत होते.अशा प्रकारे विश्वभ्रमात भोवंडणाऱ्या जीवांना विश्वात्म्याचे स्वरूप प्रत्यय देणाऱ्या आत्मज्ञानाचा विस्मर पडतो. श्रीज्ञानदेवांच्या प्रतिभाविलासातली ही एक श्रेष्ठ ओवी आहे. तिच्यातले कल्पनावैचित्र्य  प्रतिमेच्या वेगळेपणामुळे आणि भव्यतेमुळे उठून व शोभून दिसते. संकल्पाला सांजवेळ म्हणणे हा एक अनुपम बुद्धिविलास आहे सांजवेळेतील सगळी हुरहुरती भावना, त्या वेळेत वर्धमान होत जाणारे भयभ्रम, त्या वेळेत विकृत भासणारे वस्तूंचे यथार्थ स्वरूप ,व धड ना ज्ञान ना अज्ञान अशी बुद्धीची अवस्था हे सारे या प्रतिमेत श्रीज्ञानेश्वरांनी पकडले आहे. ईश्वराविषयी भ्रांत संकल्पामुळे होणारी बुद्धिभ्रंशाची स्थिति त्या सांजवेळेशी जोडली आहे

ज्ञानेश्वरांनी वर्णिलेला भगवंतांचा विस्तार

ज्ञानेश्वर म्हणतात, "ज्याप्रमाणे दूधच थिजून दही बनते ,बीज वृक्षरूपाने विस्तारते, सोने अलंकार स्वरूपात बहुविधपणे नटते ,तसाच प्रत्यक्ष श्रीईश्वर विश्वरूपाने विस्तारलेला आहे .निर्गुण असूनही त्याने ही सगुणरूपाची वृद्धी केली आहे .पाण्यात फेस तरंगावा तसे भूतमात्रांचे मेळावे या ईश्वरस्वरूपात बिंबित झाले आहेत ,पण तोच फेस हाती घ्यावा तर त्यात पाणी मात्र दिसत नाही, किंवा स्वप्नातील सृष्टी जागेपणी भासत नाही ,तसा हा भूतविस्तार जरी ईश्वराचा असला तरी ईश्वर मात्र त्यात नाही.
मी ये परीचा भूतभावनु । परि सर्व भूतांसि अभिन्नु ।
जैसी प्रभा आणि भानु । एकचि ते ॥ ८६ ॥
याप्रकारचा मी जग या कल्पनेला आश्रय आहे. परंतु मी सर्व जगाहून वेगळा नाही असा आहे.ज्याप्रमाणे सूर्य व सूर्याचा प्रकाश एकच आहे त्याप्रमाणे सर्व भूतविस्तार व मी एकच आहे.
हा आमुचा ऐश्वर्ययोगु । तुवां देखिला कीं चांगु ? ।
आतां सांगे कांहीं एथ लागु । भूतभेदाचा असे ? ॥ ८७ ॥
अर्जुना, हा आमचा ऐश्वर्ययोग तुला चांगला समजला ना ? आता यात  भूतमात्रे व मी यामधील भेदाचा संबंध आहे का ? सांग. 
कल्पना करणाऱ्या मायेमुळे, संकल्पामुळे हा भगवंताचा विश्वविस्तार भेदभावनेने प्रतीत होतो. त्यातील परमात्मअवधान संपून नुसतेच भूतमात्रांचे विस्तार जिथेतिथे दिसू लागतात.हा बुद्धीचा एक विकृत खेळ परमेश्वरी मायेमुळे खेळला जातो. मातीतून मडक्यांची रास आपोआप निपजत नाही, तर तो कुंभाराच्या संकल्पाचा दृश्य आविष्कार असतो. समुद्रात लाटांच्या खाणी आहेत असे कसे म्हणावे? ते काम वाऱ्याचे आहे. सोने अलंकाराचे रूप घेऊन येते तेव्हा बघणारा त्याला भिन्न अलंकार अभिधानांनी ओळखतो .पण ते असते मूळ सोनेच. त्याच प्रमाणे ईश्वराचा विश्वरूप विस्तार आपण सर्वत्र पाहतो पण त्यातला ईश्वर मात्र आपल्या जाणीवेतून गूढपणे लुप्त होतो."

मूढांनी परमात्म्यावर केलेला मानवी गुणधर्मांचा आरोप

श्रीज्ञानेश्वर म्हणतात ,"दृष्टीला कावीळ झाली ,की चांदणे पिवळेजर्द दिसू लागते. तापाने तोंड फणफणले की दूध कडूजार लागते त्याप्रमाणे स्थूलदृष्टीने परमेश्वराला जाणू पाहणाऱ्या मूर्खांची गती होते. स्वप्नात अमृत पिणारा अमर होत नाही ,त्याचप्रमाणे स्थूलदृष्टीने परमेश्वराला पाहणार्‍याचा कोणताच लाभ होत नाही. नक्षत्रांचे प्रतिबिंब म्हणजे जळातील रत्न असे मानून ते शोधणाऱ्या राजहंसाचा घात होतो. गंगा म्हणून मृगजळाकडे धावले तर तहान शांत होणार नाही. पण मूढांना हे समजणार नाही. त्यामुळे दृश्यसृष्टीतच ते ईश्वराला शोधतात. त्याच्यावर मानवी गुणधर्मांचा सर्रास आरोप करतात. नामरहित परमेश्वराला नाव देतात. तो विदेही असताना त्याच्यावर देहधर्माचा आरोप करतात . त्या आकारहीनाला  विविध आकार देतात. त्या निरुपाधिकाला उपाधी-उपचारांचा ससेमिरा मागे लावतात.तो कर्तव्यरहित असताना त्याला व्यवहार आहेत असे समजतात. त्या वर्णहीन गुणातीत परमेश्वराला वर्ण देतात, गुण आरोपितात. त्या चरणहस्तरहित ईश्वराला अवयव आहेत असे मानतात. त्या अरूपाला रूप, अव्यक्ताला व्यक्तित्व, अनार्ताला  दुःख देतात. त्यास आच्छादन भूषणादि विकार कल्पितात. त्या सनातनाला बाल तरुण वृद्ध आदि अवस्था आहेत असे सांगतात.
त्या अद्वैताला द्वैतभावना व अकर्त्याला कर्मे, त्या अभोक्त्याला भोग अर्पितात. कुलहीन अशा स्वयंसिद्ध अनादि ईश्वराचे ते कूळ शोधतात !त्या नित्य ईश्वराच्या मृत्यूनेही हे कष्टी होतात !चराचरात सामावलेला ईश्वर एकाचा पक्ष घेतो व एकाला शिक्षा करतो हा शोध यांनीच लावला असून याप्रमाणे मायेतून निपजलेले सर्व मनुष्यधर्म ईश्वराला चिकटवून निर्बुद्धजन मोकळे होतात व एका विपरीत ज्ञानाच्या अंधारात ते खर्‍या ज्ञानाला पारखे होतात."
जंव आकारु एक पुढां देखती ।तंव हा देव येणें भावें भजती ।
मग तोचि विघडलिया टाकिती । नाहीं म्हणौनि ॥ १७० ॥
जेव्हा एखादी मूर्ती आपल्यापुढे पाहतात, त्यावेळेला ती मूर्ती हाच देव आहे अशा समजुतीने तिची भक्ती करतात आणि मग तीच मूर्ती भंगली की हा परमात्मा नाही असे समजून पूजा करण्याचे थांबवतात.
मातें येणें येणें प्रकारें । जाणती मनुष्य ऐसेनि आकारें ।
म्हणौनि ज्ञानचि तें आंधारें । ज्ञानासि करी ॥ १७१ ॥
अशा अनेकानेक प्रकारांनी आकारावरून इतर देहधार्‍यांसारखाच मी एक मनुष्य आहे असे समजतात. म्हणून त्यांचे ते विपरीत ज्ञान माझ्या शुद्ध स्वरूपाच्या यथार्थ ज्ञानास झाकून टाकते. 

साधू-महात्म्यांचा महिमा
'महात्मानस्तु मां पार्थ' व 'सततं कीर्तयंतो मां' या नवव्या अध्यायातील तेराव्या व चौदाव्या श्लोकांचे निरूपण करताना श्रीज्ञानेश्वरांनी साधुमहात्म्यांचा प्रभाव रंगवून सांगितला आहे. याआधी मूढांच्या विपरीत ज्ञानाचे वर्णन करून शिणलेली वाचा जणू साधुमहात्म्यांविषयी बोलताना शांत आणि विश्रांत होते.
ऐसें बोलिलें देवें । तेथ जी जी म्हणितलें पांडवें ।
आइकें जेथ वाचा विसवे । ते साधुकथा ॥ १८७ ॥
श्रीकृष्ण असे म्हणाले, त्याप्रसंगी अर्जुन म्हणाला होय महाराज. (तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले) ज्या साधूंच्या वर्णनात वाणीला विश्रांती मिळते ती साधुकथा ऐक.
तरी जयाचे चोखटे मानसीं । मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी ।
जया निजेलियातें उपासी । वैराग्य गा ॥ १८८ ॥
ज्यांच्या शुद्ध मनरूपी क्षेत्रात मी स्वत: क्षेत्रसंन्यासी होऊन असतो व जे पुरुष निजले असतानाही वैराग्य त्यांची उपासना करते (म्हणजे स्वप्नातसुद्धा ज्यांचे वैराग्य ढळत नाही).
ज्ञानदेव म्हणतात ,"साधूजनांच्या शुद्ध मनात क्षेत्रसंन्यासी म्हणून भगवंत स्वतः राहात असतात .साधुजन निजले असतानाही वैराग्य त्यांच्या सेवेत तत्पर असते .त्यांच्या आस्थेच्या सद्भावनेमध्ये धर्माचे राज्य असते. त्यांचे मन म्हणजे विवेकाचा शीतल ओलावा. ज्ञानोदकात न्हायलेले पूर्णतेचेच भोजन केलेले हे सुजन म्हणजे शांतीच्या वेलीवर फुटलेले नवपल्लवच! हे परिणामाला फुटलेले अंकुर, धैर्यमंडपाचे आधारस्तंभ, आनंदसमुद्रात चुबकळून भरलेले कुंभ .भक्तीच्या बळावर हे मोक्षालाही 'मागे सर' असे म्हणतात !
ज्यांच्या लीलेमध्ये नीति जीवित असल्याचे जाणवते,जे सर्वेंद्रियांवर शांतीचे अलंकार घालून नटलेले असतात, सर्वव्यापक ईश्वराला आच्छादून घेण्याइतके ज्यांचे चित्त विशाल असते, असे हे महानुभाव.
जया भक्तीची येतुली प्राप्ती।जे कैवल्यातें परौतें सर म्हणती ।
जयांचिये लीलेमाजीं नीति । जियाली दिसे ॥ १९२ ॥
ज्यांना भक्तीची एवढी प्राप्ती झालेली असते की ते मोक्षाला पलीकडे हो असे म्हणातात, ज्यांच्या सहज कर्माचरणामधे नीती जगलेली दिसते.
हे दैवी प्रकृतीचेही दैव असतात.ते वाढत्या प्रेमाने ईश्वराला भजतात खरे, पण मनोधर्मात द्वैत मात्र फिरकू देत नाहीत. जणू ईश्वररूप होऊन ते ईश्वराची सेवा करतात.कीर्तनातील नर्तनाने ते पुण्यशील प्रायश्चित्ताचा व्यवसाय नष्ट करतात. पापाचे नाव उरू देत नाहीत .यमदमाला अवकळा आणतात, तीर्थांचे प्रस्थ नाहीसे करतात. यमलोकीची रहदारी खुंटवतात .ईश्वराच्या नामघोषाने ते विश्वाची दुःखे नाहीशी करतात.
ईश्वर एक वेळ वैकुंठात किंवा सूर्यबिंबातही नसेल, योग्यांचीही मानसे तो उल्लंघून जाईल ,पण त्या पुण्यजनांजवळ मात्र तो हरवला असेल तर निश्चित सापडेल, अशी त्यानेच येथे ग्वाही दिली आहे.
तो मी वैकुंठीं नसें ।वेळु एक भानुबिंबींही न दिसें ।
वरी योगियांचींही मानसें ।उमरडोनि जाय ॥ २०७ ॥
तो मी एकवेळ वैकुंठात नसतो,एक वेळ सूर्यबिंबातही नसतो शिवाय मी एक वेळ योग्यांची हृदये देखील उल्लंघन करून जातो.
परी तयांपाशीं पांडवा । मी हारपला गिंवसावा ।
जेथ नामघोषु बरवा । करिती माझा ॥ २०८ ॥
परंतु अशा रीतीने मी जरी हरवलो असलो तरी पण माझे भक्त जेथे माझा नामघोष चांगला करतात त्यांच्यापाशी अर्जुना, मला शोधावा, (मी तेथे सापडावयाचाच).
' कृष्ण विष्णू हरी गोविंद' या नामघोषासहित उदंड आत्मचर्चेचे गायन त्यांच्या ठिकाणी चाललेले असते. गहन योगाभ्यासाच्या यमनियमांचे कुंपण घालून आत त्यांनी मूळबंधाची बैठक मांडली असते.
येथे ज्ञानदेवांनी महात्म्यांच्या अंतरंगात चाललेल्या एका अलौकिक आंतरिक युद्धाचे रूपक रंगवले आहे. हे युद्ध महात्म्यांच्या मनात लढले आणि जिंकले जाते.प्राणायामाचा तोफखाना सुरू होतो. कुंडलिनीच्या ऊर्जेने ते ब्रह्मस्थानीचा अमृतडोह काबीज करतात. ध्यानरूप घोड्यांची गर्दी उसळते. महाभूते एकत्र जमतात. संकल्पाच्या चतुरंग सैन्याचा फडशा पडतो.' जैत रे जैत' म्हणून ध्यानाचा नगारा दुमदुमतो .तन्मय वृत्तीचे छत्र झळकू लागते .नंतर समाधीवैभवाच्या सिंहासनावर आत्मानुभवाच्या राज्याचा यांना अभिषेक होतो .असे हे साधुजन परमेश्वरी कृपेने पट्टाभिषिक्त असतात .
तयावरी जैत रे जैत । म्हणौनि ध्यानाचें निशाण वाजत ।
दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥ २१७ ॥
त्यानंतर ‘जय झाला रे झाला’ म्हणून ध्यानाची नौबत वाजू लागली व स्वरूपऐक्याचे एक छत्र (एकसत्ता) चमकत असलेले दिसले.
पाठीं समाधीश्रियेचा अशेखा । आत्मानुभव राज्यसुखा
पट्टाभिषेकु देखा । समरसें जाहला ॥ २१८ ॥
नंतर समाधीरूपी लक्ष्मीचे जे आत्मानुभावरूपी संपूर्ण राज्यसुख त्याचा समरसतेने त्यास राज्याभिषेक झाला ते पहा.
अशा शब्दात महात्म्यांचे माहात्म्य श्रीज्ञानेश्वरांनी मोठ्या तन्मयतेने वर्णिले आहे.

ज्ञानेश्वरप्रणित ज्ञानयज्ञ

गीतेतील ज्ञानयज्ञ हे एक कर्मकांड नसून ती साधनेची अत्यधिक विकसित अशी एक रीती आहे. ज्ञानेश्वरांनी  ज्ञानयज्ञाच्या खऱ्या स्वरुपाची उकल एका सुंदर रूपकातून येथे केली आहे.
तरी ज्ञानयज्ञु तो एवं रूपु । तेथ आदिसंकल्पु हा यूपु ।
महाभूतें मंडपु । भेदु तो पशु ॥ २३९ ॥
- तर ज्ञानयज्ञ तो असा आहे. त्या ज्ञानयज्ञामधे मूळसंकल्प हाच पशू बांधावयाचा खांब आहे, पंचमहाभूते हा मांडव आहे व द्वैत हा पशू आहे..
ज्ञानदेव म्हणतात," आदिसंकल्पाचा यज्ञस्तंभ मांडलेला आहे. महाभूतांचा अर्थात विराट सृष्टीचाच मंडप सजवलेला आहे. भेद म्हणजे द्वैतभावना आज या यज्ञात बळी देण्यासाठी आणलेला यज्ञपशू आहे. इंद्रिये व प्राण यांचे यज्ञसाहित्य जमा केले आहे .अज्ञानाचे घृत अग्नीला समर्पण करण्यास आणले आहे .मन व बुद्धीच्या यज्ञकुंडात ज्ञानाग्नि धडाडून चेतला आहे .साम्य ही या यज्ञाची वेदी आहे.  विवेकयुक्त बुद्धीचे कौशल्य हेच मंत्र ,विद्यागौरव व शांती हेच स्रुक व स्रुवा ही यज्ञपात्रे, जीव हाच  याज्ञिक आहे .तो प्रतीतिच्या पात्रात विवेकरुप महामंत्राचा जप करीत ज्ञानाग्निच्या ज्वाळेत भेदाचा होम करतो.तेव्हा अज्ञान संपल्याने यज्ञ व याज्ञिक वेगळे उरत नाहीत .आत्मसमरसत्वाची जाणीव होते .भूते ,विषय,इंद्रिये ही वेगवेगळी भासत नाहीत.जागे झालेल्याला स्वप्नीची विचित्र सेना म्हणजे आपणच हे जाणवते.

जैसा चेइला तो अर्जुना । म्हणे स्वप्नींची हे विचित्र सेना।मीचि जाहालों होतों ना । निद्रावशें ? ॥ २४६ ॥

अर्जुना, जसा झोपेतून जागा झालेला पुरुष म्हणतो की झोपेला वश होऊन स्वप्नातील ही चित्रविचित्र सेना मीच झालो होतो ना ? 

आतां सेना ते सेना नव्हे ।हें मीच एक आघवें|

ऐसें एकत्वें मानवें । विश्व तयां ॥ २४७ ॥

जागे झाल्यावर म्हणातो की स्वप्नातील सैन्य आता खरोखरीचे सैन्य नाही, तर स्वप्नामधे सैन्य वगैरे सर्व मीच एकटा होतो. अशा एकत्वाने संपूर्ण विश्व त्याच्या अनुभवास येते.

अशा एकरूपतेमुळे ब्रह्मदेवापासून गवतापर्यंतची ही सृष्टीविलसिते त्यांना स्वतःच्याच ठायी दिसतात. जेवढी ईश्वराची व्याप्ती तेवढाच त्या ज्ञानयज्ञ करणार्‍यांचा अनुभव, असे असल्याने तेही निरनिराळ्या आकारांत ईश्वरभावनेने स्वतःचेही चैतन्य पाहतात. सूर्यबिंबाप्रमाणे सामोऱ्या असलेल्या या ज्ञानरवीला पाठ नाही आणि पोटही नाही."

अशाप्रकारे सातव्या अध्यायातील मायानदीच्या रुपकाइतकेच भव्यसुंदर असे हे ज्ञानयज्ञाचे अर्थबहुल रूपक श्रीज्ञानेश्वरांनी नवव्या अध्यायात रेखाटले आहे. 

'वैदिकांचे पुण्यकर्म ' ज्ञानदेवांचा अभिप्राय

'त्रैविद्या मां सोमपा:' आणि 'ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं' या नवव्या अध्यायातील वीस व एकविसाव्या श्लोकावर ज्ञानदेवांनी वैदिकांचे पुण्यकर्म या विषयावर अतिशय परखडपणे आणि विस्ताराने निरूपण केले आहे.

आश्रमधर्माच्या रहाटीतून विधिवत् यजन करणाऱ्या वैदिकांपुढे तिन्ही वेदांचे मस्तक कौतुकाने लवते.ती क्रिया फलस्वरूप होऊन त्यांचा पुण्यसंचयही भरपूर होतो .पण  तो पुण्यसंचय पापरूपच असतो कारण तो ईश्वरासाठी केलेला नसून स्वर्गाच्या आशेने केलेला असतो.कल्पतरूखाली बसून झोळीला गाठी  माराव्यात आणि भिक्षेसाठी निघावे तसाच हा व्यवहार! ज्ञानदेवांनी या व्यवहाराला पुण्यात्मक पाप असे म्हटले आहे!  या पुण्यात्मक पापाने हे वैदिक, स्वर्गाला येतात आणि  पापात्मक पापाने इतरेजन नरकात जातात यात फार फरक नाही.या दोनही आडवाटाचआहेत. जे ईश्वराकडे नेते तेच तेवढे शुद्ध पुण्य.

स्वर्गा पुण्यात्मकें पापें येइजे|पापात्मकें पापें नरका जाइजे ।मग मातें जेणें पाविजे । तें शुद्ध पुण्य ॥ ३१६ ॥

पुण्यरूप पापाने (बाहेरून दिसायला पुण्य व आतून भरलेले पाप) स्वर्गप्राप्ती होते तर पापरूप पापाने नरकाला जाणे होते. मग माझी प्राप्ती ज्याने होते ते शुद्ध पुण्य होय.

स्वर्ग मागणारे, सकाम यज्ञ आदि पुण्य करून त्याचे फळ म्हणून भोगविलास इच्छिणारे असे हे वैदिक आहेत.हे अमरत्व हेच सिंहासन,ऐरावतासारखे वाहन ,महासिद्धींची भांडारे,अमृताचे तलाव ,कामधेनूची खिल्लारे, गंधर्वांचे गायन, रंभाउर्वशींसारख्या विलासिनी स्वर्गरमणी ,अशा इंद्रसुख देणाऱ्या स्वर्लोकात येतात व पुण्यांश असेपर्यंत तेथले भोग भोगतात .पण हा हंत !वेश्येसाठी सर्वस्व वेचणाऱ्याला त्याचा धनसंचय संपल्यावर तिच्या दाराशीही उभे राहता येत नाही हीच गत पुण्यसंचय संपलेल्या वैदिकांची होते. 

जैसा वेश्याभोगी कवडा वेंचे । मग दारही चेपूं नये तियेचें ।तैसें लाजिरवाणें दीक्षितांचें । काय सांगों ? ॥ ३२९ ॥

ज्याप्रमाणे वेश्येच्या नादात पैसा नाहीसा होतो, मग तिच्या दारास हात लावण्याचीही सोय रहात नाही. त्याप्रमाणे (पुण्याची पुंजी सरलेल्या) यज्ञकर्त्यांची स्थिती लज्जास्पद आहे. त्याचे काय वर्णन करावे ? 

अशा वैदिकांची मग पुनश्च रवानगी मृत्युलोकात, मातेच्या उदरगुहेत शिजून, तिथल्या विष्ठेच्या उकाड्यात उकडून निघण्यासाठी! 

अशा अत्यंत स्पष्ट व निर्भर्त्सनायुक्त शब्दात श्रीज्ञानेश्वरांनी सकाम वैदिकांची संभावना केली आहे. 

भक्तांचा योगक्षेम 

'तेषां नित्याभियुक्तानाम् योगक्षेमं वहाम्यहम्' या श्रीभगवंतांच्या बाविसाव्या श्लोकातील वचनाचा ज्ञानेश्वरप्रणित विस्तार - 

" जे सर्वभावाने मलाच वाहिलेले, जणू कोणताही व्यवसाय न जाणणारा गर्भगोळाच असे माझे भक्त, त्यांना माझ्याशिवाय दुसरे काही गोड वाटतच नाही. सुचतच नाही. माझ्याठायीच त्यांचा जीव वाहिलेला अशा अनन्यगतिक भावनेने ते माझे चिंतन करतात. त्यांची चिंता मलाच वहावी लागते. 

पैं सर्वभावेसीं उखितें । जे वोपिलें मज चित्तें ।

जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणें ॥ ३३५ ॥

जे सर्व प्रकारच्या वृत्तींसहित चित्ताने मला  विकले गेले, ज्याप्रमाणे मातेच्या गर्भातील मूल कोणत्याही व्यवहाराला जाणत नाही,

तैसा मीवांचूनि कांहीं । आणीक गोमटेंचि नाहीं ।

मजचि नाम पाहीं । जिणेंया ठेविलें ॥ ३३६ ॥

त्याप्रमाणे माझ्याशिवाय दुसरे काही ज्यांना बरे वाटत नाही आणि पहा ज्यांनी आपल्या जगण्यास माझेच नाव ठेवले आहे, ज्यांना जगण्याची दुसरी तऱ्हा माहितीही नाही..

-त्यांनी म्हणून जे जे काही करावयाचे आहे ते मलाच करावे लागते, जसे पिल्लांचे पोषण पक्षिणी करते. आपली तहान भूक न जाणणाऱ्या तान्ह्या बाळाचे सारे आईच करते, तसे माझ्यासाठी प्राण अर्पण केलेल्या त्या निष्पाप भक्तांचा सर्व भार मीच वाहतो. त्यांना माझ्या सायुज्याची -तद्रूपतेची- इच्छा असेल ती मी पुरवतो किंवा सेवा करावयाची असेल तर प्रेम देतो. ते मनाची भावना धरतील ती मी पुरवतो. त्यांचा सारा योग (म्हणजे अप्राप्ताची प्राप्ती) व क्षेम (म्हणजे प्राप्तवस्तूचे संरक्षण)मीच चालवतो, कारण त्यांच्या सर्वभावांना मीच एक आधार असतो."

अशाप्रकारे सर्वस्वी भगवंतालाच वाहिलेल्या भक्तांचा योगक्षेम भगवंत स्वतः वाहतात हे येथे श्री ज्ञानेश्वरांनी गर्भगोळ्याच्या प्रतिमेतून स्पष्ट केले आहे. 


भगवंत भक्तीभावाचा पाहुणा -ज्ञानदेवांच्या शब्दात

' पत्रम् पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति' या सव्विसाव्या श्लोकातील भगवद्वचनाचे भावपूर्ण निरूपण श्रीज्ञानेश्वरांनी केले आहे.साक्षात लक्ष्मीही अभिमान सोडून ज्या श्री नारायणाची सेवा करते, त्याला तृप्त करण्यासाठी आपण काय वहावे ?शरीराचेच तिथे लिंबलोण उतरून सकळ गुण ओवाळून टाकावेत आणि संपत्तिमदाची त्यावरून कुरवंडी करावी.पण असे असतानाही भक्तीभावाचा निखळ उल्हास जिथे ओसंडून वाहत आहे तिथे मात्र भगवंताचाही भाव वेगळा आहे. तो या भावनेचा भुकेला आहे. या भावाने वाहिलेले एक कसलेही फळ नुसते भक्ताने त्याच्या दिशेला करावे आणि परमेश्वराने दोन्ही हात पुढे करून तिकडे धाव घ्यावी. देठही न तोडता याचा आस्वाद घ्यावा . या भक्तीरसात निथळून एक फूल त्याला अर्पण करावे तर परमेश्वराने त्याचा सुगंध घ्यावा की नाही? तर तो हावरटपणाने ते खाऊनच टाकतो !

भक्तु माझियाकडे दावी ।आणि मी दोन्हीं हात वोडवीं ।

मग देंठु न फेडितां सेवीं । आदरेंशी ॥ ३८३ ॥

भक्त माझ्यापुढे ते दाखवतो आणि ते घेण्य़ाकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो.

पैं गा भक्तीचेनि नांवें । फूल एक मज द्यावें ।

तें लेखें तरि म्यां तुरंबावें । परि मुखींचि घालीं ॥ ३८४ ॥

अर्जुना भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो. 

ज्ञानदेव म्हणतात,"या आवडीने दिलेले  एखादे पान, तेही धडके नव्हे तर सुकलेले- भगवंत अशा क्षुधेने  भक्षू लागतो की जसा एखादा भुकेलेला अमृतसेवनाला बसला आहे. आता पानपालाही जर मिळत नसेल तर निस्सीम भक्ताने द्यावे तरी काय? तर पाण्याचा तरी तुटवडा नाही ना? तेही भक्तिभावाने ओतप्रोत होऊन समर्पित केले तर त्याचा प्रभाव वैकुंठापेक्षाही मोठी मोठी देवालये बांधल्यासारखा व कौस्तुभ रत्नाहून निर्मळ अलंकार अर्पिल्यासारखा आहे .या पाहुणचारातच ईश्वराला क्षीराब्धीसारखी मधुरमनोहर दुधाची शय्यास्थाने लाभली. कापूर चंदन अगरू यांचा महामेरू अर्पिला गेला. सूर्याची दीपमाळ लागली. गरुडासारखी वाहने, कल्पवृक्षाची उद्याने ,कामधेनूची खिल्लारे सादर झाली! सुदाम्याच्या पोह्यांसाठी चिरगुटाची गाठ सोडणाऱ्या भुकेल्या भगवंताचे मन हे असे आहे." 

स्त्रिया वैश्य व शूद्र यांना भगवंतांनी दिलेले आश्वासन

'म्हणोनि कुळ जाती वर्ण| हे आघवेची गा अकारण |एथ अर्जुना माझेपण |सार्थक एक||'- या शब्दात भगवंतांच्या वर्णलिंगातीत प्रभुप्रभावाचे वर्णन ज्ञानेश्वरांनी केले आहे.

तैसे क्षत्री वैश्य स्त्रिया । कां शूद्र अंत्यजादि इया ।

जाती तंवचि वेगळालिया । जंव न पवती मातें ॥ ४६० ॥

त्याप्रमाणे क्षत्रिय, वैश्य, शूद्र व अंत्यज आणि स्त्रिया ह्या भेदाधारित जाती जेथपर्यंत भक्त माझ्याशी एकरूप झाले नाहीत तेथपर्यंतच.

मग जाती व्यक्ती पडे बिंदुलें । जेव्हां भावें होती मज मीनलें ।

जैसे लवणकण घातले । सागरामाजीं ॥ ४६१ ॥

जसे समुद्रात मिठाचे कण घातले असता ते समुद्ररूप होऊन त्यांचा कणपणा नाहीसा होतो, त्याप्रमाणे मग जेव्हा सर्व वृत्ती मद्रूप होतात तेव्हा त्य़ा जाती व व्यक्ती यांच्या नावाने शून्य पडते. 

ज्यांच्या वाणीत भगवंतांचे गुणानुवाद आहेत, दृष्टीत भगवंतांचे रूप साठवले आहे ,मनात फक्त भगवंताचा संकल्प आहे, कानात भगवंताची कीर्ती भरली आहे आणि सर्वांगाला त्याच्या सेवेची भूषणे आहेत, ज्यांच्या ज्ञानात विषयांचा थांगपत्ता नाही आणि जाणीव एका परमेश्वरानेच व्यापलेली आहे ते भक्तीबळावर स्वतःच परमेश्वररूप होतात. राजाज्ञेची  मुद्रा धारण करणारा चामड्याचा तुकडा सोन्यारुप्याहून मोलाचा आहे. गंगेला येऊन मिळणारे ओहळ गंगारूप होतात.खैर चंदन आदि काष्ठांची आठवण ते अग्निरूप होईपर्यंतच. सागरात मिठाच्या कणांचे वेगळे अस्तित्व उरत नाही त्याचप्रमाणे स्त्रिया वैश्य शूद्र आदि केवळ एका भक्तीबळावर परमेश्वर होतात. 

इथे परमेश्वराने अजून एका विलक्षण मुद्द्याला स्पर्श केला आहे. भक्तीच नव्हे तर इतर कोणत्या भलत्याही तीव्र भावनेने जीव ईश्वरचिंतन करत असेल तर तो ईश्वररूप होतो. गोपींना विषयबुद्धीने, कंसाला भयभावनेने, शिशुपालादिकांना घातकी भावनेने ईशचिंतन घडले. त्याची तीव्रता इतकी की हे सर्वजण भगवंतांच्या निर्वाणस्थानीच आले!

म्हणौनि पार्था पाहीं । प्रवेशावया माझ्या ठायीं ।

उपायांची नाहीं । वाणी एथ ॥ ४७१ ॥

म्हणून अर्जुना, पहा माझ्या स्वरूपात मिळावयाचे असेल तर येथे साधनाचे बंधन नाही. 

आणि भलतिया जातीं जन्मावें । मग भजिजे कां विरोधावें ।

परि भक्त कां वैरिया व्हावें । माझियाचि ॥ ४७२ ॥

आणि वाटेल त्या जातीत जन्माला आले तरी चालेल. मग भक्ति किंवा वैर केले तरी हरकत नाही. परंतु भक्त किंवा वैरी व्हायचे असेल तर ते माझेच झाले पाहिजे.

अशाप्रकारे रूढ समाजचौकटी आणि रूढ भावचौकटी यांच्यापलीकडे असलेल्या गूढ ईश्वराने आपल्यापर्यंत कोणीही व कसाही विशुद्ध तीव्र अनुसंधानाच्या बळावर येऊ शकतो हे विलक्षण रहस्सयमय सत्य येथे सांगितले आहे. हेच राजगुह्य!


जगाचे अनित्य स्वरूप 

"अनित्यं अशुभम् लोकमिमं प्राप्य भजस्व मां" या श्लोकार्धातील भावना श्रीज्ञानेश्वरांनी आत्यंतिक तळमळीने विस्तारली आहे .

तरी भोग्यजात जेतुलें । तें एका देहाचिया निकिया लागलें ।

आणि एथ देह तंव असे पडिलें । काळाचिये तोंडीं ॥ ४९५ ॥

तर जेवढे विषयमात्र म्हणून आहेत, ते सर्व एका देहाच्याच बर्‍याकरता (सुखाकरता) उपयोगात आले आहेत. आणि या मृत्युलोकात देह तर काळाच्या तोंडी पडलेला आहे ..

बाप दुःखाचें केणें सुटलें । जेथ मरणाचे भरे लोटले ।

तिये मृत्युलोकींचिये शेवटिलें।येणें जाहालें हाटवेळे४९६

बाप रे बाप !जेथे दु:खरूपी माल आलेला आहे व तो मरणाच्या मापाने मोजला जात आहे अशा त्या मृत्युलोकात (नरदेह धारण करून) शेवटच्या बाजाराच्या वेळी येणे झाले आहे. 

आंता सुखेंसि जीविता । कैंचीं ग्राहिकी किजेल पंडुसुता ।

काय राखोंडी फुंकितां । दीपु लागे ? ॥ ४९७ ॥

आता अर्जुना, सुखाने जगणे हा माल येथे खरेदी कसा करता येईल ? राखुंडी फुंकून कधी दिवा लागला आहे काय ?

ज्ञानेश्वर जगताच्या आणि जीविताच्या अनित्यतेवर उपमांचा वर्षाव करत म्हणतात," शंभर जागी फुटलेल्या नावेत बसून स्वस्थ कसे राहावे ?शस्त्रवर्षावात उघड्या अंगाने कसे वावरावे ? चहुकडे वणवा लागलेला आहे ,आणि तिथून निघण्याचा निश्चय मात्र करू नये हे शक्य आहे काय? भगवंताला न भजण्याचे बळ जीवमात्राच्या अंगी आहे काय ?घर किंवा सुखोपभोग याची काहीच शाश्वती नाही. हे उपभोग ज्या देहाच्या बळावर घ्यायचे ते देह काळाच्या मुखी पडलेला आहे .या परिस्थितीत सुखी जीवनासाठी कोणती ग्राहकी करावी? राख फुंकून  दिवा लागेल काय ?विषाचे कांदे वाटून अमृताचा रस मिळेल का ?डोके तोडून पायाच्या जखमेवर बांधण्यात कोणता शहाणपणा आहे?इंगळ्यांच्या अंथरुणावर सुखाने झोपण्याची इच्छा करावी तरच मृत्युलोकात सुखाची अपेक्षा धरावी !ज्या लोकीच्या चंद्रालाही क्षयरोग लागलेला ,उदय होतो तो अस्तासाठी ,सुखाचा सदरा घालून दुःख प्राणीमात्रांना छळते, मंगळाच्या अंकुराला अमंगळाची कीड कधी पडते कळत नाही ,मृत्यू उदरातील गर्भालासुद्धा सोडत नाही अशा या मृत्यूलोकात अशाश्वती हीच एक शाश्वत गोष्ट आहे.."

- अशा ज्वल्ज्जहाल शब्दात या जगाच्या अनित्य स्वरूपाचे विवेचन श्री ज्ञानेश्वरांनी केले आहे व यालाच नित्य मानून व्यवहार करणाऱ्या मूढांबद्दल आश्चर्य व्यक्त करून- 

"तरि झडझडोनि वहिला नीघ । इये भक्तीचिये वाटे लाग ।

जिया पावसी अव्यंग । निजधाम माझें ॥ ५१६ ॥

"तरी या मृत्युलोकाच्या राहाटीतून झटकन मोकळा हो आणि या भक्तीच्या मार्गाला लाग,ज्या योगाने माझे निर्दोष स्वरूप पावशील."

- असे वचन श्रीभगवंतांच्या " इमं प्राप्य भजस्व मां" या वचनाच्या अनुवादार्थ योजिले आहे. 


श्रीकृष्ण-अर्जुनाच्या संभाषणाचा संजयावर प्रभाव 

गीता निवेदन करणाऱ्या संजयने पाहिले की या अमृततुल्य संभाषणाचा धृतराष्ट्रावर काहीही परिणाम नाही. जणू पुरात बसलेला रेडा! 

अहो ऐकिजत असें कीं अवधारा ।तंव इया बोला निवांत म्हातारा ।

जैसा म्हैसा नुठी कां पुरा । तैसा उगाचि असे ॥ ५२२ ॥

संजय धृतराष्ट्राला म्हणाला," ऐकत आहात काय ?" त्यावेळेला या बोलण्याविषयी वृद्ध धृतराष्ट्र ज्याप्रमाणे पाण्याच्या पुरात बसलेला रेडा हलत नाही त्याप्रमाणे चित्तात काहीही हालचाल न होता स्वस्थ असलेला दिसला.

तेथ संजयें माथा तुकिला । अहा अमृताचा पाऊस वर्षला ।

कीं हा एथ असतुचि गेला । सेजिया गांवा ॥ ५२३ ॥

त्या वेळी संजयाने मान डोलविली आणि (आपल्याशी) म्हणाला, ‘अहा । आज अमृताची वृष्टि झाली; परंतु हा धृतराष्ट्र येथेच असूनहि शेजारच्या गावाला गेल्यासारखा आहे.असो .धन्याचे दूषण काढून वाणी का विटाळावी? बाकी मुनिश्रेष्ठ व्यासांनी या मिषाने माझे अहोभाग्य उजळविले यात शंकाच नाही !"

एवढे बोलताना त्याच्या अंगावर अष्टसात्विक भाव प्रकटले .चित्त गर्क झाले. वाणी पांगुळली. रोमांचांचा जणू अंगरखाच शरीरावर चढला. अर्धोन्मीलित नेत्रातून अश्रूबिंदू गळू लागले .आंतरिक सुखातिरेकाने शरीर कंपायमान झाले. प्रत्येक रोमरंघ्रावर बारीक निर्मळ घर्मबिंदू दाटले. परम सुखाच्या आवेगाने जीवदशाच आटून जाते की काय अशी अवस्था झाली.

आतां श्रीकृष्णवाक्यबीजा निवाडु ।आणि संजय सात्त्विकाचा बिवडु ।

म्हणौनि श्रोतयां होईल सुरवाडु । प्रमेय पिकाचा ॥ ५३३ ॥

आता श्रीकृष्णाची वाक्ये हीच  उत्तम बीजे आणि त्यास संजयाच्या अष्टसात्त्विक भावरूपी  जमीन मिळाली; त्यामुळे श्रोत्यांना प्रमेय पिकाचा सुकाळ होईल. 

संजयाच्या या भावावस्थेवर या अध्यायाचा समारोप व पुढील अध्यायाचे सूतोsवाच ज्ञानेश्वर करतात.

- भारती बिर्जे-डिग्गीकर 






Comments

Popular posts from this blog

कवयित्री आणि कविता

ब्रह्मराक्षस – गजानन माधव मुक्तिबोध यांच्या कवितेचा अनुवाद –